लोक श्रीधर तिळवे नाईक
१
लोक खूप स्ट्रॉंग असतात
त्यांचा उथळपणा खूप स्ट्रॉंग असतो
त्वचा पाहणारे त्यांचे डोळे विकट असतात
जे बिकट न पाहता
सरसकट पाहतात
तू त्यांचे काय करू शकतोस ?
२
लोक व्यवस्था बनवतात
तिचे काहीही करता येत नाही
लोक धर्म बनवतात
त्याचे काहीही करता येत नाही
लोक कार्पोरेट बनवतात
त्यांचे काही करता येत नाही
लोकांचे काहीच करता येत नाही
कारण लोकांच्याकडे लोकसंख्या असते
३
लोकांची शाही आली कि
लोकांचे प्रश्न सुटतील
असं तुला वाटलं होतं
आणि लोक त्यांच्या शाहीतही
देव आणि राजे वसवत राहिले
नेते आणि अभिनेते देव्हाऱ्यात बसवंत राहिले
लोकांच्या शहाणपणावर अनेक अफवा बेतल्या गेल्या
आणि शेवटी गंज सापडल्यावर कळले
मेटल्स नाहीसे झालेत
४
एक आयुष्य
लोकांच्या कल्याणासाठी वेचलेलं
लोकांच्या मूर्खपणात वाया गेलं
आता ह्या आयुष्याचं
तू काय करणारेस ?
५
लोक
त्यांच्यासाठी वाया गेलेल्या आयुष्याचे फोटो बनवतात
किंवा पुतळे
एरव्ही लोकांना त्यांच्यासाठी वेचल्या गेलेल्या आयुष्याविषयी
काहीही देणेघेणे नसते
लोक स्वार्थी असतात
आणि लोकांचा स्वार्थ ज्यांना वापरता येतो
त्यांना ते नेते बनवतात
तुझा निस्वार्थीपणा
हा त्यांच्यासाठी फक्त चेष्टेचा विषय आहे
तेव्हा हे वाया गेलेले आयुष्य नीट गोळा कर
समाधी लाव
लोकांच्यातून
त्यांच्या नीचपणातून मुक्त होण्याचा
आणि त्यांच्या मूर्खपणाला माफ करण्याचा
सर्वोत्तम उपाय
मोक्ष आहे
श्रीधर तिळवे नाईक
{चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून }
No comments:
Post a Comment